महाराष्ट्रातील आघाडी सरकार बरखास्त करण्याची वेळ आली असताना दुसरीकडे तामिळनाडूतील राजकारणात देखील मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. बुधवारी एआयएडीएमकेची कौन्सिलची बैठक बोलवण्यात आली होती. परंतु यावेळी पक्षीय नेत्यांवर बैठकीतून अपमानित होऊन बाहेर पडण्याची वेळ आली.
समोर आलेल्या माहितीनुसार, AIADMK च्या सर्वसाधारण बैठकीमध्ये सर्व 23 प्रस्तावित ठराव फेटाळण्यात आले. यावेळी पक्षाचे नेतृत्व एका व्यक्तीकडेच देण्यात यावे या मागणीवर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ठाम राहिले. बैठकीत एडप्पाडी के पलानीस्वामी यांच्या बाजुने हे सर्व कार्यकर्ते उभे राहिल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.
त्यामुळे माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना आणि त्यांच्या समर्थकांना अवमानित होऊन स्टेज सोडून बैठकीतून बाहेर पडावे लागले. बैठकीत उडालेल्या गोंधळानंतर ही बैठक संपली असल्याचे घोषित करण्यात आले. आता पुढील बैठक ११ जुलै रोजी पार पडणार आहे.
यावेळी बोलताना, ” ओ पनीरसेल्वम हे आमचे नेते आहेत, त्यांची निवड ही आमच्या सुप्रीमो आणि दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी केली होती. परंतू पलानीस्वामी यांनी पक्ष आणि कार्यकर्ते ताब्यात घेण्यासाठी त्यांच्यावर गारुड करण्यासाठी पैशांच्या जोरावर प्रयत्न सुरु केले आहेत” असा आरोप पदाधिकारी एम संगीलीपांडियन यांनी लावला.