आयर्लंड विरुध्दच्या मालिकेत भारताने २-० असा विजय मिळवला आहे. काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने केवळ ४ धावांनी विजय मिळवलाय. दुबळ्या समजणाऱ्या आयर्लंड संघाने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र अखेरच्या षटकात भारताचे वर्चस्व निर्माण झाल्याने भारताने केवळ ४ धावांनी विजय मिळवलाय.
या सामन्यात दिपक हुडा आणि संजू सॅमसन यांनी केलेल्या जबरदस्त खेळीमुळे भारताने २२५ धावांचा डोंगर उभारला होता. यात दिपक हुडा १०४ तर सॅमसनने ७७ धावा केल्या. यात दिपक हुडाने केलेल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
मात्र आयर्लंडच्या फलंदाजांनी चांगली खेळी करत धावांचा पाठलाग केला. शेवटच्या काही षटकांत जॉर्ज डॉक्रेल आणि मार्क अडैर यांनी केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे आयर्लंड विजयाच्या जवळ पोहचला होता. मात्र शेवटी सामना भारतीय संघाने जिंकला.
दरम्यान, प्रमुख खेळाडूंचा भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान ऐतिहासिक कसोटी सामना हा येत्या १ जुलैपासून सुरु होत आहे. यानंतर इंग्लंड विरुध्द भारत ३ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळले जाणार आहे. या मालिकेसाठी भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला मायदेशी न येण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
यामुळे उमरानला इंग्लंड विरुध्दच्या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.