मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरोधात पुकारलेल्या बंडानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता उद्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत चाचणी पार पडणार आहे. या बहुमत चाचणीमुळे आघाडी सरकार आता चांगलेच अडचणीत येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बहुमत चाचणी म्हणजे काय?
पार पडणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये विद्यमान सरकारकडे बहुमताचा आकडा आहे की नाही हे पाहिले जाते. यासाठी विधानसभेचे विशेष सत्र बोलाविण्यात येते. यामध्ये निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी सभागृहात हजर असलेले आमदार मतदान करतात. यावेळी किती आमदारांनी मतदान केले यावरून बहुमत चाचणीचा निकाल ठरविला जातो.
बहुमत चाचणीसाठी मतदान करायचे की नाही हा सर्वस्व अधिकार त्या आमदाराचा असतो. विधानसभेत जेवढ्या आमदारांनी मतदान केले आहे, त्यावरून बहुमताचा आकडा ठरविला जातो. बहुमत चाचणी ही अत्यंत पारदर्शक प्रक्रिया असते. मुख्य म्हणजे, या प्रक्रियेत राज्यपाल हस्तक्षेप करत नाहीत. बहुमत चाचणी आवाजी पद्धतीने, शीरगणतीने, हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान अशा पद्धतीने देखील घेतली जाते.
विद्यमान सरकार आपल्या आमदारांना विधानसभेत उपस्थित राहण्यासाठी पक्ष व्हिप जारी करते. सध्या राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शीरगणतीने मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या राज्याच्या विधानसभेत सध्या 288 आमदार आहेत. यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीसाठी ठाकरे सरकारला 145 आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे.
ज्या पक्षाकडे बहुमताचे आकडे जास्त आहेत तो पक्ष सरकार स्थापन करू शकतो. त्यामुळे आता उद्या विधानसभेत बहुमत चाचणी पार पडली तर ठाकरे सरकारला सरकार टिकवून ठेवण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. मुख्य म्हणजे, या बहुमत चाचणीवेळी एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार मतदान करतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.