शुक्रवारी मनोरंजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींसाठी देण्यात येणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार “गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाला देण्यात आला आहे. या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका अभिनेत्री सायली संजीव हिने साकारली आहे.
त्यामुळे चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर सायलीने माध्यमांना प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे की, “नमस्कार मी सायली संजीव, चित्रपटाला पुरस्कार दिल्याबद्दल प्रतिक्रिया देणं मला अजिबात शक्य नाही. मला खूप आनंद झालाय. मला बाबांची फार आठवण येतेय.
https://www.instagram.com/reel/CgUGCk0Pu_N/?igshid=YmMyMTA2M2Y=
कारण त्यांची फार इच्छा होती की एखादा मोठा आणि मानाचा पुरस्कार मला मिळावा. गोष्ट एका पैठणीची हा आतापर्यंत माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा चित्रपट आहे आणि कायम राहिल” त्याचबरोबर, “यासाठी सर्वात आधी अक्षय बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी या सर्वांचे मनापासून आभार मानते. तसेच शांतनू रोडे यांचेही आभार मानते.
या चित्रपटाची संपूर्ण टीमचेही मी मनापासून अभिनंदन करते. त्यासोबतच मला गोष्ट एका पैठणीची यात काम करायला मिळालं यासाठी मी स्वत:ला धन्य समजते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार” अशा शब्दात सायलीने आपला आनंद व्यक्त केला आहे. ही प्रतिक्रिया देताना सायली भावूक देखील झालेली दिसत आहे.
दरम्यान गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनू रोडे यांनी केले आहे. तर या चित्रपटात मुख्य भूमिका सायलीने साकारली आहे. हा चित्रपट एका तरुण मुलीच्या स्वप्नावर आधारित आहे. या मुलीचे स्वप्न एक पैठणी साडी घेण्याची आहे. चित्रपटात मुलीचा पैठणी साडीपर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे.