राज्यात येऊन गेलेल्या राजकिय भूकंपाचे पडसाद अजूनही पहायला मिळत आहे. शिवसेनेतील महत्त्वाचे नेते एकामागोमाग शिंदे गटात जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला (Shivsena) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील (Prakash Patil )यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
स्वाभिमान जपत राजीनामा देण्याचा निर्णय
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे सहभागी झाले. त्यात माझा कोणताही सहभाग नव्हता. मात्र तरीसुद्धा पक्ष नेतृत्वासह पदाधिकाऱ्यांकडून संशय व अविश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे आपण व्यथित असून तब्बल 35 वर्षे शिवसेना संघटनेत शाखा प्रमुख ते जिल्हाप्रमुख पदापर्यंत काम करीत असताना पक्ष संघटना वाढीसाठी निस्वार्थ प्रयत्न केले.
सध्या पक्ष नेतृत्वाकडून संघटनेच्या कामातून आपणास खड्यासारखे बाजूला करण्याचे प्रयत्न काही हितशत्रू पक्ष नेतृत्वाच्या साथीने करीत आहेत. त्यामुळे अपमानित होऊन संघटनेत राहण्यापेक्षा स्वाभिमान जपत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे”, असे मत प्रकाश पाटील यांनी पडघा ( Padgha) येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
शिवसेनेला मोठा धक्का
प्रकाश पाटील यांनी पक्षातून राजीनामा दिल्याने ठाणे येथील शिवसैनिक व पदाधिकारी हे व्यथित झाले आहेत. येत्या निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. यावेळी प्रकाश पाटील हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार का? या प्रश्नावर मी “संघटनेत केलेल्या कामाचे महत्त्व ओळखून आपणास विचारणा केली तर भविष्यात त्या बाबत निर्णय घेऊ ” अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.