कविता ननवरे | श्रीलिपी आणि राखीव सावल्यांचा खेळ या दोन उत्तम कथासंग्रहाचे लेखक म्हणून मराठी साहित्य विश्वात आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे किरण गुरव. साहित्यातल्या गढूळ राजकारणापासून कोसोदूर शांतपणे आपलं काम करीत राहणे हे किरण गुरव यांचं वैशिष्ट्य. अनेकदा कथालेखकाला सांगाव्याशा वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीसाठी कथेचा अवकाश कमी पडतो तेव्हा त्याची कादंबरी होते असं मला वाटतं. कथालेखक म्हणून नावारूपाला आलेल्या किरण गुरव यांची जुगाड ही पहिलीच कादंबरी.
कथालेखकापेक्षा किरण गुरव कादंबरीकार म्हणून संपूर्ण वेगळे आहेत हे जुगाड वाचून प्रकर्षानं जाणवलं. जुगाडचं कव्हर काढून ‘ही किरण गुरव यांची नवी कादंबरी आहे.’ असं म्हणून कुणी वाचायला दिली असती तर मी चुकूनही त्यावर विश्वास ठेवला नसता. कारण भाषेचा, शैलीचा वेगळा प्रयोग लेखकाने कादंबरी लिहिताना केला आहे. कादंबरी पहिल्या पानापासून पकड घेते ती हातावेगळी करावी वाटत नाही. यापूर्वी कुणीही न मांडलेलं अभियांत्रीकीचं एक वेगळं आणि दुर्लक्षित जग जुगाडच्या रूपात पुढे आलं आहे.
अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या भावी इंजिनीरांचे कळपच्या कळप डोळ्यात गलेलठ्ठ पगाराचं आणि पर्मनंट नोकरीचं स्वप्न घेऊन महाविद्यालयातून बाहेर पडतात. त्यांच्या पुढ्यात उभी असलेली बेकारीची, ब्रेकरूपी अनिश्चित भविष्याची आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये भरडून काढणारी, तात्पुरत्या नोक-यांची खाई त्यांना पूर्ण अनोळखी असते असे नाही, पण त्या खाईत होरपळून निघायला लागलं की त्या खाईची दाहकता अधिक प्रकर्षानं कळू लागते. कादंबरीचा नायक ‘शशा’ हा याच तरूणपिढीचं प्रतिनिधित्व करतो. पर्मनंटरूपी नोकरीच्या मृगजळामागे धावताना शशाची झालेली दमछाक लेखकाने अत्यंत बारकाईने वाचकांसमोर मांडली आहे. प्लँटवर, प्रोजेक्टवर, कंपनीत सतत वेगवेगळा जुगाड करून कामं पूर्णत्वाला नेणाऱ्या शशासारख्या कित्येक अभियंत्यांना कायमस्वरूपी नोकरीचा जुगाड करता येत नाही हेच वास्तव किरण गुरव यांनी आपल्या कादंबरीतून प्रभावीपणे मांडलं आहे.
छोट्याशा गावातून पदवीचं भेंडोळं घेऊन पुण्यासारख्या औद्योगिक कंपन्यांनी व्यापलेल्या शहरात नोकरी शोधायला आलेला शशा श्री लॉजवर आपल्यासारख्याच पोरांबरोबर काही काळ वास्तव्य करतो. वेगवेगळ्या कंपन्यांच्या गेटवर, नोकऱ्या देणाऱ्या एजंटकडे वारंवार चकरा मारूनही काही महिन्यांच्या तात्पुरत्या नोकरीशिवाय शशाच्या हाताला फार काही लागत नाही. काही महिन्यांचा कामाचा अनुभव, पुणे शहरानं बहाल केलेलं मूठभर शहाणपण आणि पुष्प्या नामक जिवलग मित्र एवढया कमाईवर शशा पुण्याचा निरोप घेतो, कारण गावाशेजारी सुरू होणाऱ्या एका नवीन प्लँटवर शशाला पर्मनंट नोकरी मिळालेली असते. साईट इंजिनियर म्हणून प्लँटवर मिरवणारा शशा हाती पडेल ते कार्य तडीस नेत असतो. तिथेही त्याला परप्रांतीय कामगार चांगले सहकारी मिळतात. त्याच्या रूक्ष बनत चाललेल्या दिवसांना सहनीय करणारी मैत्रीण भेटते.
पर्मनंटचं गाजर दाखवत कंपनी शशासारख्या नव्या भिडूंकडून हाताला आणि बुडाला घट्टे पडेपर्यंत काम करून घेते पण त्या कामाचा योग्य आणि वेळेवर मोबदला देत नाही. ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’ म्हणत पर्मनंटच्या गाजराचा गोडवा आज ना उद्या आपल्याला चाखायला मिळेल या आशेवर तग धरून राहण्याशिवाय या भिडूंना पर्याय असत नाही. लालची कंपनी मालकांच्या राजकारणाच्या झळा सोसत आहे तिथे भक्कमपणे टिकून राहण्याचा जुगाड करणं हे आदीम व अंतिम सत्य लेखक शशाच्या माध्यमातून पुढे आणतो. ही फक्त शशाची गोष्ट नाही. नोकरी मिळवून ती टिकवण्यासाठी कुत्तरओढ करत अपमान, अवहेलना झेलणाऱ्या असंख्य तरूणांची ही गोष्ट आहे. लेखकाने नायकाच्या गोष्टीसाठी पार्श्वभूमी जरी अभियांत्रिकीची निवडली असली तरी ती गोष्ट ‘जागतिकीरणाच्या रेट्यात सेटल होण्यासाठी धडपडणाऱ्या’ प्रत्येक तरूणाला आपलीशी वाटेल यात शंका नाही.
हातातून सगळंच निसटून जात असताना नायकाच्या उद्विग्नतेचा होणारा प्रवास लेखकाने जेवढा संवेदनशिलतेने तेवढाच तटस्थपणे रेखाटला आहे. कादंबरी सुरूवातीला जबरदस्त पकड घेते परंतु लेखक जेव्हा कंपन्यांमधील तांत्रिक माहिती सांगण्यात बरीच पानं खर्ची घालतो तेव्हा अभियांत्रिकी क्षेत्राबद्दल, मशिनरी वगैरे तांत्रिक गोष्टींबद्दल फार काही माहिती नसणाऱ्या वाचकांची पकड सुटण्याची शक्यता वाटते. कादंबरीचे संपूर्ण कथानक याच पार्श्वभूमीवर घडते त्यामुळे ती कादंबरीची गरज आहे हे ही ध्यानात घेणे गरजेचे आहे. कादंबरीची सगळ्यात जमेची बाजू आहे ती म्हणजे कथनासाठी वापरलेली भाषाशैली. लेखक जे काही कथन करतो त्याला वरवर विनोदाचा बाज असला तरं अंतरंगातलं दारूण वास्तव ठळक झाल्यावाचून राहत नाही.
आज हरेक क्षेत्रात यंत्राचा वावर माणसांपेक्षा अधिक आहे. ही यंत्रच माणसाचा आवाज गिळंकृत करत आहेत. माणसाची यंत्रासारखं कायमस्वरूपी एकाच जागी खिळून राहण्याची जी इच्छा आहे तीच माणसाचं यंत्रात रूपांतर होण्याला कारणीभूत आहे की काय असं वाटतं. जुगाडमध्ये प्रत्येकाला आपापला स्ट्रगल सापडेल. काहींना आपलीच गोष्ट आपण जगतो आहोत असेही वाटेल. आपापल्या क्षेत्रात स्थिरावलेल्या, स्थिरावू पाहणाऱ्या सगळ्यांनी वाचावी अशी कादंबरी आहे.
जुगाडने किरण गुरव या नावावर नव्या दमाचे सशक्त कादंबरीकार म्हणून मोहोर उमटवली आहे असं म्हणायला वाव आहे.